अतुल भांबेरे : आधुनिक किसान
नाशिक, ता ३ : दलाल आणि व्यापार्यांच्या तडाखाड्यात शेतकरीच नव्हे; तर त्याने मेहनतीने पिकविलेला भाजीपालाही सापडत असून वाहतुकीचे पैसे वाचावे म्हणून नाशिक जिल्ह्यातील काही व्यापार्यांकडून हा भाजीपाला चक्क रेल्वेच्या शौचालयातून मुंबईला वाहून नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘आधुनिक किसान’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आला आहे. शेतकर्यांना भावात नाडविण्याबरोबरच त्यांची अशा प्रकारे बदनामी करण्याचे कारस्थान व्यापारी/दलाल मंडळी सर्रास करत आहेत. तर दुसरीकडे आपल्या मायेने भाजीपाला जपणारा शेतकरी मात्र या प्रकारापासून अनभिज्ञ आहे.
पद्मपुर ते जनस्थान असा प्रवास करणार्या नाशिकमधून गुलाबाच्या फुलापासून चिवडा कांदा द्राक्षे सातासमुद्रापार पोहविण्याचा इतिहास आहे. आता अनेक फळभाज्यांनीही नाशिकचा झेंडा सातासमुद्रापार पोहचवला आहे. पण याला आता गालबोट लागतंय का अशी शंका निर्माण झाली आहे. कारण नाशिक जिल्ह्यातून मुंबईला जाणारा भाजीपाला हा थेट रेल्वेच्या माध्यमातून रोज सकाळी ९ वाजेच्या सुमारास निफाड रेल्वे स्टेशन वरून जातो. त्यातील काही भाजीपाला मात्र रेल्वेच्या मालवाहू बोगीऐवजी प्रवासी डब्यांमधील शौचालयातून नेला जातो. निफाड परिसरातील शेतकर्यांकडून खरेदी केलेला भाजीपाला येथील काही व्यापारी रोज मुंबईला नेतात तर काही नाशिकला. रेल्वेप्रशासनाच्या डोळ्यादेखत काही महिला व पुरुष भाजीपाल्याच्या गोण्यारेल्वेच्या मालवाहू डब्यात न टाकता प्रवाशांच्याच डब्यात टाकतात. प्रवाशांची गर्दी असेल, तर या गोण्या कोणताही विचार न करता थेट शौचालयात ठेवल्या जातात. हा प्रकार निफाड रेल्वे स्टेशनव्यतिरिक्त मनमाड, लासलगाव, नाशिक, अशा अनेक स्टेशनवरून रोज पाहायला मिळतो.
विशेष म्हणजे शौचालयातील घाणेरडा वास आणि अस्वच्छतेच्या वातावणात ठेवलेला हा भाजीपाला प्रवाशांच्या ही नजरेस पडतो. पण त्याबद्दल कुणीही विचार करत नाही की तक्रार करत नाही, ही वैषम्य वाटावी अशीच गोष्ट आहे. विशेष म्हणजे काही किरकोळ विक्रेते भाजीपाल्याच्या काही जुड्या थेट शौचालयातून काढून त्याच डब्यातील प्रवाशांना ,‘ साहेब मेथी घ्या मेथी…..५ रुपये जुडी लावली… बरं ४ रुपये द्या’ असे म्हणत स्वस्तात देतात. याप्रकाराबद्दल अनभिज्ञ असलेले प्रवासीही मग संध्याकाळच्या भाजीचे काम होईल म्हणून स्वस्तात मिळतीय तर घ्या असा विचार करत एक नाही तर दोन जुड्या घेतात.
स्टेशन जवळ येऊ लागतं तसा शौचालयात ठेवलेल्या मालाच्या गोण्या दरवाजात आणण्याची धावपळ सुरू होते व त्याच दरम्यान प्रवाशांचीही स्टेशनवर उतरण्याची व चढणार्याची एकच गर्दी होते. या गर्दीत हा भाजीपाला अक्षरशः पायदळी तुडवला जातो. कधी या भाजीपाल्याच्या गोण्या गर्दीमुळे थेट प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूच्या दरवाजातून रेल्वे रुळाच्या मधोमध असलेल्या नाल्याजवळ ढकलून दिल्या जातात. ट्रेन गेल्या नंतर या गोण्या खांद्यावर वर घेत स्टेशनच्या बाहेर नेल्या जातात. मुंबईच्या रेल्वे स्टेशन परिसरातच भरणार्या मंडईत हा भाजीपाला बर्यापैकी नफा कमवून सायंकाळच्या पंचवटी एक्स्प्रेसपर्यंत विकला जातो. कसारा, डोंबिवली, ठाणे, कुर्ला दादर व सी एस टी च्या रेल्वे स्टेशन परिसरात हा भाजीपाला विकल्यानंतर विक्रेते पैसे मोजत आनंदाने रात्री उशीरा घरी परततात. दुसर्या दिवशी पहाटे लवकर उठून शेतकर्याचा बांधावरून व नाशिकच्या बाजार समितीतून भाजीपाला खरेदी करून पुन्हा त्यांचा हाच नित्यक्रम सुरू होतो. प्रस्तुत प्रतिनिधीने पंचवटी एक्सप्रेसने मनमाड ते मुंबई असा सलग ४ दिवस प्रवास करून भाजीपाल्याची हेळसांड कॅमेर्यात टिपली.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जिल्यातून दररोज किमान दीड लाख पालेभाज्यांच्या जुड्यांची आवक होते. उत्पादन वाढल्यानंतर हेच प्रमाण दोन लाखांवर जाते. त्यामध्ये सर्वात जास्त जुड्या कोथंबीर, कांदापात, शेपू, पुदिना, पालक , व मेथी आशी आवक होते. यातला जवळपास ४० % भाजीपाला हा रेल्वेने याच पद्धतीतून नेला जातो तर उर्वरीत ६० % भाजीपाला हा ट्रक, टेम्पो च्या माध्यमातून मुंबई व गुजरात मध्ये नेला जातो. कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता व्यापारी हा माल ट्रक मध्ये दाबून दुबून भरतात. शिवाय झाकून हा माल नेला जात नाही तर उघड्यावरच २०० ते २५० किलो मीटर हा माल परराज्यात नेला जातो रस्त्याने उडणारी धूळ व उन्हाच्या तडाख्याने हा भाजीपाला गुजरातला पोहचेपर्यंत सुकून जातो. हा नाशवंत भाजीपाला मग स्वस्तात ग्राहकांच्यामाथी मारला जातो.
मालवाहू बोगीचे भाडे चुकविण्यासाठी शौचालयातून नेला जाणारा भाजीपाला असो किंवा परराज्यात उघड्या ट्रकद्वारे नेला जाणारा भाजीपाला असो, या सर्व प्रक्रियेत ग्राहकाच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे अन्नसुरक्षा कायदे आणि मानके यांचे शेतकर्यांनी पालन करावे म्हणून कर्तव्यदक्ष भूमिकेत जात असताना, आणि काही पर्यावरणवादी पालेभाज्यांच्या रासायनिक फवारण्यांवरून शेतकर्याला दुषणे देत असताना, त्या बळीराजाने मेहनतीने पिकविलेला भाजीपाला मात्र नियम धाब्यावर बसवून काही उपटसुंभे लोक ग्राहकांच्या माथी मारत आहेत. पालेभाज्यांच्या रासायनिक फवारण्यांवरून मोठमोठ्या चर्चा रंगत असताना, शौचालयाच्या माध्यमातून ग्राहकाच्या स्वयंपाकगृहात जात असलेल्या भाजीपाल्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही, ही शेतकर्याची आणि भारतीय शेतीची मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल.



nice and excellant job
very very nice story
this act is very shamefull. such vegitables are harmful to pepole. so as soon as stop this act. your reporter mr. atul bhambere taken good efforts for this sting operation & compile good story.
Well Done Mr Atul… An Eye Opening Story…
hi tar deshachi shokatikaa aahe he kuthe tari thabyala have ,adunik kisan ne ji mohim suru keli aahe taya badl dhnyvaad ,aami tumachyaa barobar aahe
शेतकर्यांनी काबाड कष्ट करून पिकविलेला भाजी पाला आम्हा ग्राहकान पर्यंत येतांना कोणत्या अव्स्तेतून येतो याच केलेलं हे चित्रण क्षण भर का होईना विचार करायला लावणार आहे. आम्ही देखील हे चित्र अनेक वेळेला बघितलेले असून हि बाब आमच्या निदर्शनास आली नाही परंतु आज हि चित्रफित बघून खरोखर मन सुन्न झाले. या प्रकरणाची दखल रेल्वे प्रशासनाने व पणन मान्र्यांनी घ्यावी हिच मनस्वी इच्छा आहे. समाज प्रभोधानासाठी तुमच्या वार्ताहराने केलेलं हे धाडसी वृत्त संकलन खरोखर स्तुत्त्य आहे.
this is very dengerous thing to c coz all people r depend on farmers food in specialy maharashtra so v hv 2 thnk on it very carefully
so… m thankful to Mr. Atul Bhambere
EXCELLENT WORK, ATUL CAN SHOOT HIS NEWS IN DREAMS TOO..KEEP IT UP