नाशिक, दि.६ (अतुल भांबेरे) कांदा भाववाढ अल्प कालावधीसाठी राहण्याची शक्यता असून या भाववाढीमुळे केंद्र सरकार निर्यातबंदी करणार नाही, असे मत नाफेडचे संचालक चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केली आहे. पोळ व रांगड्ा कांद्याचे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुमारे बारा लाख उत्पादन होते. यावर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात कांदा उत्पादनात सुमारे तीन लाख टन कांद्याची लागवड कमी झाली त्याचा परिणाम बाजार आवारात येणार्या आवकेवर झालेला आहे.
दरम्यान आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील कांदा देशांतर्गत बाजार पेठेत दाखल न झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याला देशभरातून मागणी वाढत असल्याने भावात तेजी असल्याचे होळकर यांनी सांगितले. यंदा उन्हाळा कांदा १५ ते २० टक्क्याने कमी होणार आहे. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान राज्यात पाऊस बरा झालेला असल्याने तेथे कांदा लागवड बरी होईल; परंतु गुजरातमध्ये कमी लागवड राहील. कमी पावसाचा परिणामावर मात करीत शेतकरी इतर पर्याय शोधून कांदा पीक घेतली. यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. उन्हाळ कांद्याची आवकसुरू होईपर्यंत कांदा बाजार भावात तेजी राहील. मात्र भाववाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार निर्यात बंदी करणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
देशात अनेक राज्यांत कांद्याचे पीक होत असल्याने महाराष्ट्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही. सध्या राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधून देशांतर्गत कांदा जात आहे. उत्तर भारतात आपल्याकडील कांद्याला मागणी नाही; परंतु साऊथमध्ये बंगाललाच आपल्या कांद्याला मागणी आहे. नैसर्गिक परिस्थितीमुळे वर्षातून कधी तरी तेही अल्पकालावधीसाठी भावात तेजी येते त्याचा अवास्तवपणे बाऊ केला जातो. पाण्याची कमतरता खताच्या वाढत्या किमती वाढीव मजुरीचे दर या बाबींना शेतकर्यांना सामोरे जावे लागते आहे.
गतवर्षी ३० जानेवारीला २०१२ ला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची किमान आवक ५०० तर कमाल १७६० सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झालेली होती. ३० जानेवारी २०१३ ला एक हजार तीन वाहने व ६३ बैलगाडीमधून २५ हजार ४५ क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान १५०० कमाल २२५१ सरासरी २१५० रुपये दराने विक्री झाली. कांदा भावाने एक हजारी भावाचा टप्पा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार केला. जानेवारी मध्यानंतर १५०० रुपये भावाचा टप्पा पार करून आज दोन हजारीपेक्षा जादाचा टप्पा गाठला आहे. सध्या कांदा उत्पादकांना मिळत असलेले दर जास्त असले तरी एकरी उत्पादनात घट झाल्याने उत्पादन खर्च आणि मिळत असलेल्या भावात जेमतेम तोंड मिळवणी होणार आहे.

No Comments