औरंगाबाद दि. १४ ः जायकवाडी काठच्या शेतकर्यांचा खंडीत केलेला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा नसता या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जायकवाडी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिला. पैैठण तालुक्यातील ढाकेङ्गळ येथे आयोजित शेतकर्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
शेतीला पाणी मिळत नसेल तर जायकवाडी धरणातील एक थेंबही पाणी उद्योगांना मिळू देणार नाही असा इशारा यावेळी उपस्थिती शेतकर्यांनी दिला. यावेळी पंडीत थोरात, कल्याणराव गायवाड, अप्पासाहेब निर्मळ, कैलास शेंगुळे, मनोहर एरंडे, रमेश जाधव यांची विचारमंचावर उपस्थिती होती.
सूर्यवंशी म्हणाले की, शासनाने पिण्यासाठी पाणी राखीव ठेवायचे म्हणून शेतीचा पाणीपुरवठा बंद केला मात्र, दारू आणि बियर कंपन्यांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवला आहे. औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
शेतीपेक्षा उद्योगांना लागणारे पाणी जास्त असून मोठ्या प्रमाणावर कंपन्यातून बाहेर पडणारे पाणी वाया जात असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. शेतकरी जसे शेतीसाठी शेततळे तयार करून पाणी साठवणूक करत आहे तसे प्रयोग उद्योगांना अनिवार्य करण्याची मागणी त्यांनी केली. जायवाडीच्या पाण्यावर प्रथम हक्क स्थानिक शेतकर्यांचा निर्माण व्हावा यासाठी व्यापक चळवळ उभारण्याचे संकेत त्यांनी दिले.
प्रशासकीय अधिकार्यांच्या चुकीच्या धोरणामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे कल्याण गायकवाड यांनी सांगितले. शासनाने किमान पाच तास तरी येथील शेतकर्यांचे पाणीपंप चालवू द्यावेत आणि याबदल्यात किमान एक एकर चारा शासनाला पुरविण्यात येईल असे सर्वानुमते या बैठकीत ठरविण्यात आले.
दरम्यान शेतीचा पाणीपुरवठा तोडून दारू कंपन्यांना पुरविण्यात येत असलेल्या पाण्याबाबत सा. ‘आधुनिक किसान’ ने मांडलेला विषय शेतकर्यांच्या बाजूने भक्कम पुरावा असल्याच्या प्रतिक्रीया यावेळी शेतकर्यांनी व्यक्त केल्या. या विषयाचा अंक या बैठकीत सर्वात महत्त्वाचा विषय ठरल्याचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

No Comments