सोलापूर (मोहन काळे) ः जिल्ह्यातील बहुतांश द्राक्ष बागा सध्या डिप्लोडिया रोगाला बळी पडल्याने यावर्षीच्या द्राक्ष उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा, मोहोळ व पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्षाचे उत्पादन घेतात. यातील उत्तर व दक्षिण वगळता पंढरपूर, मोहोळ व माढा तालुक्यातील शेतकरी बेदाण्याची निर्मिती करतात. जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड आहे.
दुष्काळामुळे काही द्राक्ष बागा जळाल्या असल्या तरी काही शेतकर्यांनी पाणी विकत आणून द्राक्षबागा वाचविल्या आहेत. त्यामुळे यंदा शेतकर्यांचा जास्त खर्च पाण्यावर झाला आहे. अशा परिस्थितीत उभ्या असलेल्या द्राक्षबागा डिप्लोडिया रोगाला बळी पडल्या आहेत.
द्राक्ष घडाची काडी अर्ध्यावरच तयार झालेली असते. ती पुढे तयार होत नाही. हिरवीच राहते. त्यामुळे घडातील मनी सुकतात. व वाळून जातात. काहीलोक वेलींवर जास्त घड ठेवल्याचे कारण सांगतात. पण नेमके कारण बहुतांश शेतकर्यांना माहितच नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
द्राक्ष बागेला यावेळी वातावरण चांगले राहिल्यामुळे शेतकर्यांनी वेलींवर जास्त घड ठेवले आहेत. पंढरपूर तालुक्यात याचे प्रमाण जास्त आढळून आले. जास्त घड ठेवलेल्या द्राक्ष बागेतही द्राक्षाचे घड सुकू लागले आहेत. घड सुकल्यामुळे ङ्गोलपट बेदाण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा बेदाण्याला तुलनेत कमी भाव मिळू लागल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यंदा द्राक्ष पिकाला वातावरण चांगले असले तरी द्राक्ष घड सुकू लागल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

No Comments