प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्राचा वापर करून जळगाव फेरण (ता. जि. औरंगाबाद) येथील सिकंदर कडूबा जाधव यांनी कमी पाणी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांनी डाळिंब, मोसंबी, पेरूची फळबाग लागवड केली आहे. दरवर्षी ते ठिबकवर कापूस उत्पादन घेतात. काशीफळ आणि भोपळ्याच्या बीजोत्पादनातही जाधव अग्रेसर आहेत.
सिकंदर कडूबा जाधव हे जळगाव फेरण येथील रहिवासी. औरंगाबाद-जालना मार्गावर शेकटा येथून दोन-तीन किलोमीटर अंतरावर जाधव यांची शेती आहे. त्यांना वडिलोपार्जित सव्वादहा एकर शेतजमीन असून यापैकी सव्वाचार एकर त्यांच्या वाट्याला आली आणि तीन एकर जमीन त्यांनी विकत घेतली. १९८९ साली त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. येथूनच खर्या अर्थाने शेतीत आधुनिकता आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. यासाठी विविध ठिकाणी जाऊन प्रगत शेतीतंत्राबाबत माहिती घेतली. शेतीविषयक कार्यशाळांमध्ये सहभागी झाले. यातून प्रेरणा मिळत गेली आणि शेतीतील उत्पादन वाढवत त्यांनी विकास साधला.
पिकासाठी पाण्याची व्यवस्था
जाधव यांची शेती पाण्याअभावी तशी हंगामीच म्हणावी लागेल. सुरुवातीच्या काळात सिंचनासाठी सामाईक विहीर होती. यामुळे संपूर्ण क्षेत्रात पीक घेणे शक्य होत नव्हते. पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी जाधव यांनी शेतात दोन बोअर घेतले. या बोअरला चांगले पाणी लागले. यानंतर उपलब्ध पाण्यात जास्तीत जास्त पीक घेता यावे, यासाठी त्यांनी पीक पद्धतीत बदल केला. खरिपात कापूस, तूर, मूग, बाजरी आणि रब्बीत गहू, हरभरा यांसारखी पिके सुरुवातीला घेतली. पाण्यामुळे पिकांच्या क्षेत्रासोबतच उत्पन्नात वाढ झाली. यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते पीक पद्धतीत बदल करत गेले. पिकासाठी कमी पाणी लागावे म्हणून त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला.
जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न
पाण्याची व्यवस्था केल्यानंतरही जमीन हलकी असल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. उत्पादन वाढीसाठी जमिनीची प्रत सुधारण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी शेतालगतच्या तलावातून २०० ट्रॉल्या गाळ जमिनीत टाकला. पुढील दोन-तीन वर्षे जमिनीत गाळ टाकला. जमिनीत ताग, ढेंच्या यांसारखी हिरवळीची पिके घेतली. यामुळे जमिनीची सुपीकता वाढत गेली. त्यांनी मातीच्या नमुन्यांची तपासणी करून घेतली आणि पिकांना आवश्यकतेप्रमाणे रासायनिक खतांचा वापर केला.
३ बाय २ फुटावर कापूस लागवड
कृषी विभागाने सन २००६ मध्ये या गावात एक शेतीशाळा आयोजित केली होती. शेतकर्यांनी ३ बाय २ फूट अंतरावर कापूस लागवड करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले होते. यानुसार सिकंदर जाधव यांनी ४ बाय ४ फुटांवर कापूस लागवड करण्याची आपली जुनी पद्धत बदलून कृषी अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार कापूस लागवड केली. दरम्यानच्या काळात कपाशीला ठिबक सिंचनाने पाणी देण्याची व्यवस्था केली. यामुळे कापसाचे एकरी २० क्विंटल उत्पादन मिळाले. जाधव यांच्या तुलनेत इतर शेतकर्यांना यावर्षी कपाशीचे निम्मेच उत्पादन झाले. जाधव यांनी वापरलेल्या तंत्राच्या प्रभावामुळे इतर शेतकरी त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीनुसार कापूस लागवडीकडे वळाले.
फळबाग लागवडीकडे वाटचाल
नियमित पिकांवर अवलंबून न राहता ङ्गळबाग लागवड करण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला. यासाठी त्यांनी कमी पाण्यात येणारी ङ्गळपिके घेण्याचे निश्चित करून दोन एकरात डाळिंब, एक एकर क्षेत्रात पेरू व दोन एकरांमध्ये मोसंबी लावली. डाळिंबाची लागवड करताना त्याच्या व्यवस्थापनाचा बारकाईने अभ्यास केला. डाळिंबाच्या झाडांना सेंद्रिय व गांडूळ खत तसेच निंबोळी पेंड दिल्याने रासायनिक खतांवर होणार्या खर्चात बचत झाली. डाळिंबाची देखरेख करण्यासाठी लागणार्या मनुष्यबळाचा विचार करता त्यांनी कमी मनुष्यबळ लागणार्या पेरूच्या ‘सरदार ४९’ या वाणाची लागवड केली. सोबतच पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन मोसंबीचीही लागवड केली. विशेष म्हणजे या तिन्ही प्रकारच्या फळबागांची लागवड केल्यानंतर कामाच्या वेळा वेगवेगळ्या येतील, याची काळजी घेतली.
काशीफळ, भोपळा बीजोत्पादन
फळबाग लागवड केल्यानंतर फळपीक हातात येण्यास चार-पाच वर्षांचा कालावधी लागणार होता. यामुळे गुंतविलेल्या जमिनीतून कोणतेही उत्पन्न या काळात मिळणार नव्हते. हे नुकसान टाळण्यासाठी जाधव यांनी या जमिनीत फळबागेला पूरक ठरेल, असे वेलवर्गीय आंतरपीक घेण्याचे ठरविले. नंतर काशीफळ व भोपळ्याचे बीजोत्पादन घेण्याची कल्पना त्यांना सुचली. यासाठी त्यांनी ‘महाबीज’ व इतर बियाणे कंपन्यांशी करार केला. जाधव हे खरिपात काशीङ्गळ व रब्बी हंगामात भोपळ्याचे बीजोत्पादन घेतात. अशा प्रकारे त्यांनी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधला.
सेंद्रिय खत निर्मितीला महत्त्व
जमिनीतून विविध प्रकारचे उत्पादन घेत असताना जमिनीचा कस टिकून राहील, याकडे जाधव हे विशेष लक्ष देतात. यासाठी त्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. निंबोळी पेंड तयार करण्यासाठी जाधव यांनी एक गिरणी विकसित केली असून यासाठी निंबोळी विकत घेतली जाते. किटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा फवारणीसाठीदेखील चांगला उपयोग होत आहे.
सुधारित अवजारांचा वापर
शेतमजुरांची समस्या लक्षात घेऊन सिकंदर जाधव यांनी आपल्या गरजेनुसार शेती अवजारात काही बदल करून अवजारे तयार केली. कापूस लागवड करताना खत आणि फुल्ली एकाच ठिकाणी पडावी, यासाठी एक यंत्र तयार केले. सायकलचलित कोळपे वापरताना अवघड जात असल्याने मनुष्यचलित कोळपे बनविले. एक जुने
मिरची कांडप यंत्र खरेदी करून त्याचे रूपांतर निंबोळीची भुकटी करण्यासाठी केले. बोअर नादुरुस्त झाल्यास पंप काढण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि ताकद कमी लागावी, यासाठी एक क्रेन विकसित केले आहे. जाधव यांनी शेतीत केलेल्या विविध प्रयोगांसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानदेखील झाला आहे.
संपर्क ः सिकंदर कडूबा जाधव
जळगाव फेरण, ता. जि. औरंगाबाद
मो. नं. ९६६५४४७४२९
- राहुल कुलकर्णी / औरंगाबाद
Read More →